(Ba Balicha)
लेखक : राजन गवस
प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन
या कादंबरीतली गोष्ट नेमकी आहे कोणाची? एका भांडीविक्याने घेतलेल्या एका लेखकाच्या शोधाची की भांड्यांवर नावं घालणाऱ्या लेखकाची? लेखकाने लिहिलेल्या सिनेमाच्या पटकथेची की त्या पटकथेत न मावणाऱ्या शेतकऱ्याची? जोतीराव फुल्यांच्या स्वप्नभंगाची की दिवसेंदिवस स्वार्थी आत्मकेंद्री विखंडीत होत चाललेल्या समकालीन समाजाची ? की या सगळ्यांचीच ? सांगणं अवघड आहे. पण ही केवळ गोष्ट नाही एवढं निश्चित.
या कादंबरीला अनेक आरंभ आहेत, पण शेवट नाही. ‘कथांतर्गत कथा’ अशी रचना असलेल्या या कादंबरीत डायऱ्या आहेत, पत्रं आहेत, पटकथाही आहे. कादंबरीतले दिपूशेठ, कोणकेरी, आडव्याप्पा ही सगळीच पात्रं आपापल्या भोवतालचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. झपाट्याने ‘नागर’ होत चाललेल्या ग्रामीण बहुजन समाजाविषयीचा, त्यातल्या व्यक्ती आणि कुटुंबांविषयीचा हा गुंता आहे. नागरीकरणाच्या वामनी पावलाने समाजाच्या तळाशी गाडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या जीवनाविषयीचा हा गुंता आहे. वाजतगाजत सुरू असलेल्या नागरीकरणाची नेमकी दिशा कोणती? ती आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे? या नागरीकरणाची मूल्यव्यवस्था कोणती? त्यातून कोणाचं हित जपलं जात आहे? अशा कळीच्या प्रश्नांचा हा गुंताळा आहे.
ही कादंबरी वाचणं म्हणजे प्रश्नांच्या या गुंताळ्यात गुरफटत जाणं. वाचकाची त्यातून सुटका नाही आणि कादंबरीला शेवट नाही.
राजन गवस यांच्या लेखकीय कारकिदीने ‘ब, बळीचा’ या कादंबरीच्या रूपाने एक नवं वळण घेतलं आहे, हे निश्चित.
– नितीन रिंढे
(out of stock)
MRP ₹475 ₹405 (70₹ Discount)